बीड : कोयत्यांना धार देण्यासाठी मी कायम उभी राहील असे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हणत चुकीचा अर्थ घेऊ नका. मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी स्वत: मंत्री आहे असे असताना मी नवीन पक्ष का काढेल? असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मला मंत्री झाले काय नाही झाले काय, काही फरक पडत नाही. एवढे प्रेम तुम्ही करता असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. पण मंत्रिपदामुळे अधिकार येतात असेही त्या म्हणाल्या. १८२५ दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे. वरचे २२५ दिवस असेच जातात. माझ्या १६०० दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचे काम करेल असे आश्वासन देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि धर्मकारणात एकमेकांशी नाते असलेच पाहिजे. राजकारणात काम करणा-या माणसाने धर्मकारणात हस्तक्षेप करू नये. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून माहीत आहे की दर वेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण बघा, सगळे जग बघत आहे.
पर्यावरण मंत्र्यासमोरच फटाके फोडता का?
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, लोक मला विचारतात तुम्ही जिथे जातात तिथे तुमचेच लोक फुले घेऊन स्वागतासाठी तयार असतात का? काहींना असेही वाटत असते. पण मी म्हणते मलाच माहीत नसते माझ्या स्वागतासाठी कोण एवढी तयारी करते. मी तर नेहमी म्हणत असते की जेसीबीने फुले नका उधळू. आता मी रागावले म्हणून फटाके फोडणे बंद केले. पर्यावरण मंत्री समोर फटाके उडवून पर्यावरणाची वाट लावता का? असा मिश्किल सवालही त्यांनी केला.