नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला असून असंख्य प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना आणि जखमींना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, तर जखमींना अडीच लाख, तर किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी दु:खी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. संपूर्ण टीम त्या व्यक्तींना मदत करण्यासाठी काम करत आहे, ज्यांना या घटनेमुळे नुकसान झाले आहे असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली.
त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर पटनाला जाणारी मगध एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर जम्मूला जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस उभी होती. त्याचदरम्यान, महाकुंभ निमित्ताने प्रयागराज एक्स्प्रेस ही विशेष गाडी जाणार होती. ही गाडी आधी प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर येणार अशी उद्घोषणा करण्यात आली. मात्र, नंतर प्रयागराज एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येणार अशी उद्घोषणा झाली आणि त्यानंतर लोकांची धावपळ सुरू झाली. यात जिन्यावरून उतरताना काही जण पाय घसरून पडले आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.
मृतांच्या कुटुंबीयांना मदत
केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या चेंगराचेंगरीत जे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना अडीच लाखांची मदत दिली जाणार आहे, तर किरकोळ जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे.