उन्हाळा आणि माठाचा घडा यांचं एक अनोखं नातं आहे. उन्हाळा आला म्हटल्यावर, बाजारात गाड्यांवर माठ विकण्याची सुरुवात होते. माठाचा वापर हा फार पूर्वापार चालत आलेला आहे. फ्रीज आल्यावर कालांतराने हा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाला.
पण त्यानंतरही काही जणांनी माठाचा वापर सुरूच ठेवला होता. माठाला म्हणूनच ‘गरिबांचे फ्रीज’ असेही संबोधले जाते.
फ्रीजमधले पाणी आणि माठातले पाणी या दोन्हींच्या चवीमध्येही खूप फरक आहे. फ्रीजमधल्यापेक्षा माठातील पाण्याची चव ही केव्हाही सरस आणि सुंदर लागते. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही माठातील पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते.
माठातील पाणी पिण्याचे फायदे
माठातील पाणी पिण्यामुळे शरीरातील आंतरिक उष्णतेवर मात करता येते. माठातील पाणी पिल्यामुळे पचनशक्ती देखील सुधारते. डोकेदुखी तसेच टॉन्सिलसारख्या समस्या माठातील पाणी पिल्यामुळे उद्भवत नाहीत.
फ्रीजच्या पाण्यामुळे घसा दुखण्याचा संभव असतो, परंतु हाच धोका मात्र माठातील पाणी पिल्यामुळे होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोट खराब झाल्यास, माठातील पाणी पिण्यामुळे पचनशक्ती सुधारते.
माठाच्या पाण्यामुळे गॅसच्या समस्येतून आपली सुटका होते. मुख्य म्हणजे माठाचे पाणी नैसर्गिकरीत्या आपल्या पोटातील उष्णता थंड करते. त्यामुळेच पोटांच्या विकारापासून आपला बचाव होतो.
माठाचे पाणी पिण्यामुळे रक्तदाब चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते. म्हणूनच माठाचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरही देतात.
उन्हामुळे चेह-यावर मुरमे, फोड येतात. अशावेळी माठातील पाणी हा एकमेव उत्तम उपचार आहे. माठातील पाणी म्हणूनच त्वचेसाठी उत्तम मानले जाते.