बुलडाणा : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया अजूनही सुरू असून पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून हा हल्ला झाल्यामुळे राज्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला आहे. सरपंच निलेश देशमुख आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिनमध्ये जेवायला बसलेले होते. दोन्ही गटांत यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या क्षुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोन्ही गटांतील परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच देशमुख यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुद्धा आपणास सरपंचासह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात गुन्हेगारांकडून हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.