सिरोही : वृत्तसंस्था
राष्ट्रीय महामार्ग-२७ वर कार आणि मालवाहू ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात दाम्पत्य आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. कारमधील सातही जण गुजरातमधील अहमदाबादहून जालोरला परतत होते. एका महिलेवर गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातही जण राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.
अहमदाबादहून जालोरला परतत असताना गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास अबू रोड परिसरातील किवरली येथे कार आणि ट्रॉलीची धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एका महिलेला गंभीर अवस्थेत सिरोही येथे रेफर करण्यात आले.
अपघातात कारचा चक्काचूर होऊन अपघातग्रस्त अडकले होते. यानंतर पोलीस पथकाने क्रेनच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये अडकलेली कार बाहेर काढली आणि त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कारचे दरवाजे तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी कारचे इतर भाग वेगळे केले. सुमारे ४० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर कारमधून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले.