उमरगा : प्रतिनिधी
शहरातील दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे यामध्ये शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापक व हॉटेल व्यवसायिकाचा समावेश आहे. या दोघांच्या आत्महत्येने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक डॉ. भागवत तुकाराम व्हणाळे हे कार्यरत होते. त्यांनी १० मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या शवविच्छेदनानंतर ११ मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर उमरगा येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यविधी करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आनंद रत्नाकर जेवळे(पाटील) (३०) यांनी सकाळी आपल्या तुळजाभवानी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. विशेष म्हणजे डॉ. भागवत व्हनाळे यांच्या आत्महत्तेनंतर आनंद पाटील घरी व दवाखान्यात मदतीसाठी आले होते, असे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. सकाळी आनंद पाटील यांनी स्वत: आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. या तरूण युवकांनी आत्महत्या केल्याने शहरात शोककळा पसरली होती.