बीड : आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मध्यंतरी मला एक फोन आला होता, कृष्णा आंधळे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉण्ड्री वर तृतीयपंथीयांच्या वेशात असू शकतो असे समोरच्या व्यक्तीने मला सांगितले. त्यांनी मला हेही सांगितले की बीड जिल्ह्यातल्या अनेक तृतीयपंथीयांसोबत त्याचे चांगले संबंध होते. त्यामाध्यमातून महामार्गावर वसुली सुध्दा करण्यात येत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच तृतीयपंथीयांसोबत त्यांचा वेश धारण करून एखाद्या वस्तीमध्ये तो तिथे असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता. मात्र त्यामध्ये कितपत सत्य आहे की नाही यामुळे मी तातडीने त्या संदर्भात कोणाशी बोलले नव्हते असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी देशमुख कुटुंबातील सगळ्यांना भेटले त्यांचे एकच म्हणणे आहे, त्यांना तातडीने न्याय मिळाला पाहिजे. आईने तर मला सांगितले की जसे माझ्या मुलाला तडफडून मारले तसे कायद्यानुसार माझ्यासमोर आरोपींना देखील तडफडून मारले पाहिजे. राज्यामध्ये अशा घटना होतात, त्या मीटवल्या जातात, लपवलल्या जातात. सत्तेच्या माजावर, पैशाच्या माजावर मात्र हे प्रकरण सगळ्यांनी उचलून धरले म्हणून हे प्रकरण इथपर्यंत पोहोचले आहे. फास्टट्रॅक कोर्टात सुद्धा अनेक केसेस जातात मात्र वर्षानुवर्षे त्यांना न्याय मिळत नाही, मात्र या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, वाल्मीक कराड १५ आणि १६ डिसेंबरला दिंडोरीचे जे गुरुपीठ आहे अण्णासाहेब मोरे यांचे तिथे मुक्कामाला होता. त्याबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता हे दोघेही तिथे राहिले आहेत, त्यांना व्हीआयपी वागणूक व्हीआयपी जेवण दिले गेले आहे. त्यांना माहीत होतं. खंडणीतील आरोपी आहेत, हत्येतील आरोपी आहेत तरीसुद्धा मुद्दामून त्यांना तिथे ठेवले गेले असा आरोपीही त्यांनी यावेळी केला.