नागपूर : प्रतिनिधी
सोमवारी रात्री साडेबारा-दीडच्या सुमारास पोलिस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावले आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
दरम्यान, नागपुरात सोमवारी रात्री तणाव निर्माण होऊन दगडफेक, जाळपोळ झाली होती. त्यानंतर शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. नागपूरची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी प्रतिक्रिया दिली.
सोमवारी रात्री साडेबारा-दीडच्या सुमारास पोलिस प्रशासनाने नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम १४४ (कर्फ्यू) आपण लावले आहे. काही ठिकाणी गाड्यांचे, दुकानांचे, घरांचे नुकसान झाले आहे. लोक काही घरांमध्ये घुसले होते. अशा गंभीर बाबतीत कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेल्या दाव्याबद्दल माहिती घेतली आहे. त्यांचे म्हणणे आहे की रात्री दहा वाजता नागरिकांकडून स्थानिक पीआयना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, पण तो झाला नाही. याचे कारण समोर आले नाही, पण या घटनेची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन योगेश कदम यांनी दिले.
सकाळच्या वेळी एक आंदोलन झाले, कुठलाही वादविवाद न होता दुपारी काही जण पोलिस स्थानकात जमा झाले होते, त्यांचे पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले, वाद तेव्हाच मिटला होता. चार-पाच तासांनंतर काही जणांनी प्लॅनिंग केले असावे, असा अंदाज आहे, मात्र खात्रीशीररीत्या सांगता येणार नाही. घर आणि गाड्यांवर हल्ले करण्यात आले, याचे कुठून आणि कोणी प्लॅनिंग केले, याची चौकशी करण्यात येईल, असेही कदम म्हणाले.
हिंसाचाराचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. १२-१४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर २-३ सामान्य नागरिक जखमी आहेत. या घटनेचे मूळ कारण शोधून काढणार, असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.