पालघर : प्रतिनिधी
वसईतील रास्तभाव दुकानांमध्ये होणा-या धान्याच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश झाल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाई करत ५ शिधावाटप दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच, संबंधित दुकानचालकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. भारतीय खाद्य निगममार्फत पुरवले जाणारे स्वस्त धान्य शिधावाटप केंद्रात पोहोचवण्याऐवजी थेट खासगी बाजारात विकले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.
तसेच, काही दुकानदारांनी चलन नसतानाही धान्याच्या गोण्या अन्यत्र उतरवल्याचे निष्पन्न झाले. याबाबत, या भागातील सामाजिक कार्यकर्त्या आशा पाटील यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करत रंगेहाथ हा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर, पुरवठा विभागाने कारवाई करत ५ दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत अशाप्रकारे स्वस्त धान्य दुकानातील माल खासगी बाजारात विकण्याचा घाट घातला जातो. यामध्ये, अनेकदा स्थानिक पुरवठा अधिका-यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खोलवर जाऊन तपास केल्यास अशी प्रकरणे उघडकीस येतात. आता, वसई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई केल्यानंतर ५ दुकानांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
या प्रकरणात जगदंबा महिला बचत गट, जितेंद्र चव्हाण, श्रमिक महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट यांच्या विरोधात माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.