मुंबई : छावा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर राज्यासह देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महायुती सरकारला दंगलीवर राज्य करणार का? असा कडक सवाल केला आहे.
छावा चित्रपटानंतर राज्यातील औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमधील कबर हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर आली. भाजप सत्ताधा-यांनी ही कबर हटवण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी ही कबर हटवण्यासाठी १७ मार्चला राज्यभर आंदोलन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये दंगल उसळली. यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी छावा चित्रपटावरून देशभर निर्माण होऊ घातलेल्या तणावावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘छावा’ सिनेमा हा इतिहास आहे. इतिहासातील घटना आहे. म्हणून इतिहास हा आपण आताच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीने आणायला लागलो, तर देश पुढे जाणार आहे का? जगातील अनेक देश वेगळ्या पद्धतीने पुढे जाताना पाहात आहोत. अशावेळी दंगली सुरू होणे, समाज-समाजात तणाव निर्माण होणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.
अशावेळी सरकारची काय जबाबदारी असते, यावर बोलताना असे तणाव न होण्यासाठी, दंगली न होण्यासाठी काम केले पाहिजे. समाजात तेढ निर्माण न होण्यासाठी, कोणताही राज्यकर्ता असताना, समाज आनंदी कसा राहिल, यावर राज्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. राज्य कशावर करतो आहे, दंगलीवर राज्य करायचे काय? गोळीबार चाललाय, अश्रूधुर चालला आहे, तर वाहा वाहा आम्ही काय राज्य करतो, असे अभिमानाने सांगणार असाल, तर राजधर्म म्हणून ते योग्य नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी फटकारले.