कल्याण : कल्याणमधील १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करणा-या नराधम विशाल गवळीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर त्या मुलीच्या पालकांनी जसे केले तशी शिक्षा विशाल गवळीला मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. ही घटना (ता. १३) पहाटे उघडकीस आली. यानंतर त्याच्या वकिलांनी मात्र मोठा आरोप करताना त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.
तर अक्षय शिंदेसारखेच विशाल गवळीला पोलिसांनी मारले असावे असा धक्कादायक आरोप केला आहे.
कल्याणमधील १३ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करून तिची हत्या करण्याचा आरोप विशाल गवळी याच्यावर होता. याप्रकरणी तो तळोजा तुरुंगात होता. पण आज त्याने कारागृहातील बाथरूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस आला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
यानंतर आता विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी आक्षेप नोंदवताना पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धनके यांनी, गवळी याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. तर ज्या पद्धतीने अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली तशीच हत्या विशाल गवळीची करण्यात आली असावी असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच विशालच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात याआधीच न्यायालयात अर्ज केल्याचा खुलासा देखील धनके यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान आज पहाटे त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
बदलापुरातील चिमुरडीवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच कल्याणमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये असे प्रकरण घडले होते. ज्यात कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करून तिची निर्र्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुंड प्रवृत्तीच्या विशाल गवळीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने १३ वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणाची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तर त्याचेही अक्षय शिंदेप्रमाणेच एन्काऊंटर करा अशी मागणी करण्यात आली होती.