कोल्हापूर : प्रतिनिधी
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापुरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाडामध्ये ही घटना घडली. रस्त्या अभावी रुग्ण महिलेला रुग्णालयात आणण्यास खूप उशीर झाला. वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दगडूबाई राजाराम देवणे असे मृत महिलेचे नाव आहे. रस्त्या अभावी आणखी किती महिला रुग्ण आणि नागरिकांचा मृत्यू होणार असा सवाल धनगर वाड्यातील लोकांकडून विचारला जात आहे.
कोल्हापूर शहरापासून २० ते २५ किलोमीटरवरील धनगर वाड्यात रस्ते नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. उपवडेपैकी बेंडाई धनगरवाडा इथं शंभर ते दीडशे लोकसंख्या असलेला धनगर वाडा आहे. तसेच इथली काही घरे पन्हाळा तालुक्यातील गावाला जोडलेली आहेत. त्यामुळे विकासापासून धनगर वाडे कोसो दूर आहेत.
दगडूबाई देवणे दुपारी भर उन्हात शेतात काम करत होत्या. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली. त्याखाली कोसळल्या. रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तातडीने झोळीत घालून त्यांना पाचकटेवाडी इथे आणले.
रस्ता खचल्यामुळे डोंगरातून उतरताना चौघांना अडचणी येत होत्या. कसं तरी करत त्यांनी दगडूबाई यांना रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.