33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रकाश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, काश्मीरच्या टूरवर गेलेले अनेक पर्यटक सध्या तिथे अडकले आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल (२२ एप्रिल) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातील एस. बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक पर्यटक तिथे पर्यटनासाठी गेले होते. या घटनेनंतर या सर्व पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात यायचं आहे. या सर्व पर्यटकांना राज्यात आणण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे देखील बोलले जात आहे.

मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून
५ लाखांची मदत जाहीर
दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण ६ जणांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. तर या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ५०,०० रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR