24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव

ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव

आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

मुंबई : दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना बदनाम करायचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. याशिवाय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. त्याचप्रमाणे सरकार ३१ डिसेंबरला पडणार असल्याची भविष्यवाणीही आदित्य ठाकरेंनी केली.
युवासेनेकडून ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर होत आहे. घटनाबा सरकार आहे. घटनाबा मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या एफडी नक्कीच वाढवल्या असतील. पण घाबरू नका ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आहे. पालिकेला दक्षिण मुंबईच्या रोड संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत मात्र अजूनही उत्तर दिले नाही.

खोक्यांसाठी अनेक प्रकल्प रखडलेले
मुंबई, महाराष्ट्राची लूट सुरू आहे. मुंबईतले दहिसर, वरळी आणि इतर असे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत. हे सरकार आणि प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही. दिल्लीला उत्तर देत आहेत. पालिकेला आम्ही प्रश्न विचारतो मात्र ते उत्तर देत नाहीत. हा मुद्दा आम्ही अधिवेशनात घेऊ, पुढील लढाई कोर्टात नेऊ. आमचं सरकार असताना प्रत्येक प्रकल्पासंदर्भात प्रत्येक एजन्सीला घेऊन आम्ही बसायचो, चर्चा करायचो, प्रत्यक्षात जाऊन कामाची पाहणी करायचो. ऑक्टोबरच्या आसपास वरळी-शिवडी कनेक्टर व्हायला हवा होता, मात्र अजून झाला नाही, असे अनेक प्रकल्प आहेत. जे लवकर पूर्ण होणार होते मात्र या सरकारचे लक्ष नाही. खोक्यांसाठी अनेक प्रकल्प लेट केले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

सरकार गुजरातच्या हिताचे
आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांची त्यांना भीती वाटते त्यांना असा बदनाम करायचे ते काम करतात. अधिवेशन आले की ते असे वातावरण निर्माण करतात. भीती चांगली आहे. आरोप लावणे त्यांची पॉलिसी झाली आहे. खोटे बोलायचे आणि रेटून बोलायची त्यांची सवय आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला तसे मुंबई विकू देणार नाही. आरक्षणाचा मुद्दा आहेच मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही गुजरातच्या हिताचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR