26.4 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रपानिपत येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार

पानिपत येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. पानिपत ही आमच्या पराभवाची नाही, तर मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे. पानिपतच्या लढाईत त्या दिवशी पराभव झाल्याचे शल्य मनात असेल पण तिथे आमचा पराभव झाला असे आम्ही मानत नाही. पानिपतमधून उर्जा घेऊनच महादजी शिंदेंनी नंतर दिल्ली जिंकली,

छत्रपती शिवरायांचा भगवा देशात लावला. या देशाकरिता मराठे लढले म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तेथे तयार झाले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे मराठयांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना पानिपत येथील स्मारकाची आठवण करून दिली. पानिपतचे कुठलेही स्मारक हे पराभवाची आठवण करून देणारे आहे. पानिपतात मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारूण पराभव झाला, हा इतिहास पुसता येणार नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारणीचा पुनरुच्चार केला.

पानिपतची लढाई ही आमच्या शौर्याची लढाई आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी पानिपतची लढाई झाली. ती लढाई मराठे जिंकलेच होते. या लढाईत मराठ्यांना कोणाचीच मदत झाली नाही, तरीही मराठे भारतासाठी लढले. पानिपतात गोलाची लढाई होती. पण दुर्देवाने गोल फुटला. तिथे पारडे अब्दालीच्या बाजूने झुकले. पण ही लढाई इथे संपत नाही. त्यानंतर महादजी शिंदेंनी १० वर्षांनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एकछत्री अंमल आणला.

अब्दालीला मराठ्यांनी इतके उध्वस्त केले होते की तो या देशात थांबलाच नाही, तो गावी परत गेला. म्हणून पानिपतच्या लढाईबाबत काही शल्य असेल पण आमचा पराभव झाला असे मी मानत नाही. पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदेंनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात लावला. या देशाकरिता मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झालेच पाहिजे असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR