कोल्हापूर : राज्यासह देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून गेल्या दोन दिवसात बाधितांच्या मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसात देशभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या चिंतेचे मळभ वाढत आहेत. अशातच कोल्हापुरमध्ये देखील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याचे घटना उघडकीस आली आहे. तर पीपीई किट नसल्याने त्या महिलेचा अंत्यसंस्कारही रखडल्याचे आता समोर आले आहे. पीपी किट नसल्याने पालिका कर्मचा-यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दोघेही कोल्हापूरचे आहेत. एकीकडे दोन दोन मंत्री जिल्ह्यात असताना जिल्ह्यातच कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच जिल्ह्यातही कोरोना रूग्ण आढळता. पाचगाव येथील एका ७५ वर्षीय महिलेला कोरोनीची बाधा झाली. तिला उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्या चार दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.
यानंतर तिच्यावर अन्त्यसंस्कार करण्याची तयारी केली जात असतानाच पालिका कर्मचा-यांनी पीपी किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. यामुळे आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच पालमंर्त्यांसह वैद्यकीय शिक्षण मंर्त्यांवर जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ती ३७८३ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार, केरळमध्ये सर्वाधिक १४०० रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात ४८५ आणि दिल्लीत ४३६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. गेल्या ४८ तासांतच १००० रूग्ण वाढले आहेत. दरम्यान जानेवारीपासून कोरोनामुळे आतापर्यंत २८ जाणांना मृत्यू झाला असून यात गेल्या दोन दिवसात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जो धक्कादायक असून तर महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे एकाच दिवशी नव्या ६८ रूग्णांची भर पडली असून महाराष्ट्रात ४८५ बाधित रूग्णांचा आकडा झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात तब्बत ९५९२ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून जानेवारी २०२५ पासून मुंबईत एकूण ७४९ रुग्ण आढळले आहेत.