धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील पानवाडी येथे नारळाच्या झाडाची फांदी का तोडत नाही, या कारणावरून १३ जणांनी एका युवकाला व त्याच्या आई-वडीलांना मारहाण केली. ही घटना दि. ११ मे रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी युवक अक्षय माने यांनी जिल्हा रूग्णालयात उपचार दरन्यान दिलेल्या जबाबावरून ढोकी पोलीस ठाणे येथे दि. १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पानवाडी येथील गणेश रंगनाथ मोरे व अक्षय दत्तात्रय माने यांच्या कुटुंबामध्ये नारळाच्या झाडाची फांदी तोडण्यावरून व जागेच्या कारणावरून जुना वाद आहे. दि. ११ मे रोजी हा वाद उफाळून आला. पानवाडी येथील आरोपी गणेश रंगनाथ मोरे, विशाल बालाजी मोरे, अजय शिवाजी मोरे, पांडुरंग दगडू मोरे, कमल पांडुरंग मोरे, योगीता जाधव, सुलभा कोळगे, बाबासाहेब कोळगे, नितीन देविदास माळी, सर्व रा. पानवाडी ता. धाराशिव तसेच इतर चार व्यक्तींनी दि. ११ मे रोजी सकाळी घरातून बोलावून फिर्यादी अक्षय दत्तात्रय माने (वय २६ वर्षे,) याांना मारहाण केली. आरोपींनी नारळाच्या झाडाची फांदी का तोडत नाही, या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कु-हाड, रॉड, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे आई-वडील हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
मारहाणीत जखमी झालेल्या अक्षय माने यांच्यावर धाराशिव येथील जिल्हा रूग्णायात उपचार सुरू होते. उपचार दरम्यान पोलीसांना दिलेल्या जबाबावरून दि.१३ मे रोजी ढोकी पोलीस ठाणे येथे कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भा.दं.वि.सं. अन्वये १३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.