मुंबई : प्रतिनिधी
भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला असून राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी असल्याची जळजळीत टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा सवाल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार गटावर निशाणा साधला. बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक छळ करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिनीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजितदादांच्या पक्षातलेच कसे? प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधा-यांनी घेतले आहे. त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते. या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता. पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारणात चमकवण्यात जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली.
शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया
राज्यातील महायुतीचे सरकार हे भ्रष्टाचाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री, आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर आणि त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी यावेळी केली.