अकोला : मनोज जरांगे शनिवारी मुंबईच्या दिशेला निघणार आहेत. २६ जानेवारीला मुंबईत त्यांच्या नेतृत्वात मुंबईत मोठे आंदोलन होणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. ते म्हणाले की, गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेली ३५ वर्षे चाललेला आहे. पण इथल्या श्रीमंत मराठ्याने त्याला कधीही स्वरुप आणि आकार दिलेला नाही.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरुपही आले आणि एक आकारही आला. त्याचबरोबर एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आहे, ज्याला समाजामध्ये सहानुभूती असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गरीब मराठ्याच्या आरक्षणाचे वेगळे ताट निर्माण करायचे असेल तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेबाबत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे.
गरीब मराठ्यांचा आवाज, जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे. तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे. त्यांचे आंदोलन चालू असताना ते या दृष्टीने सुद्धा विचार करतील, त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.