24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमालवणमधील शिल्पकार आपटे नॉट रिचेबल

मालवणमधील शिल्पकार आपटे नॉट रिचेबल

मुंबई : प्रतिनिधी
ठाणे येथील २५ वर्षीय युवा शिल्पकार जयदीप आपटे नॉट रिचेबल झाले आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला होता. हा पुतळा उभारण्याची जबाबदारी जयदीप आपटे यांना दिली होती. महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर विरोधकांनी पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरले आहे.

दरम्यान आता या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे सर्व कुटुंबासोबत घराला टाळे लावून पसार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या त्यांचा मोबाईल क्रमांकही आता बंद आहे. तसेच कल्याण पश्चिमेत त्यांचा कारखाना आहे. तो कारखाना देखील ताडपत्रीच्या साह्याने बंद करण्यात आला आहे. जयदीप आपटे यांना शिल्पकलेचा केवळ अडीच वर्षाचा अनुभव असून, आतापर्यंत त्यांनी फक्त दोन फुटांपर्यंतचे पुतळे उभारले आहेत, अशी माहिती त्यांनीच एका मुलाखतीदरम्यान, दिली होती.

यामुळे एकडा कमी अनुभव असताना त्यांना शिवाजी महाराजांचा मालवण येथील भव्य पुतळा उभारायची जबाबदारी का दिली असा प्रश्न विरोधकाकडून सरकारला विचारला जात आहे.दरम्यान, शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यासोबतच राज्यातील विविध जिल्ह्यात दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत.

राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेवर केला गंभीर आरोप
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूणार्कृती पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, हे ठाणे कनेक्शन आहे. पुतळा उभारण्याची जबाबदारी ज्यांना दिली होती ते सर्व कंत्राटदार गायब झाले आहेत. मुख्यंत्र्याच्या मुलाला विचारा कंत्राटदार आपटे कुठे आहे. अशी सडकुन टीका खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR