बुलडाणा : प्रतिनिधी
सोयाबीन व कापूस दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरूवारी सायंकाळी उशिरा राजूरी घाटातून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत तुपकरांचा जामीन मंजूर केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक करून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने रविकांत तुपकर यांची जामीनावर सुटका केली असून, पोलिसांनी तुपकरांची केलेली अटक ही बेकायदेशीर ठरवली आहे.
या सुटकेनंतर रविकांत तुपकर यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. “मला झालेली अटक ही बेकायदेशीर ठरवली आहे. सरकारने कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करु.. असेही ते म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या अटकेविरोधात तुपकरांच्या समर्थकांनी खामगाव- बुलढाणा रोडवरील वरवंड फाटा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला होता. तसेच आज रविकांत तुपकर यांना न्यायालयात आणल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.