पिंपरी : प्रतिनिधी
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर बापू भेगडे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपची भूमिका समोर आली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. आता त्यांनी बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप कार्यकर्त्यांची अवहेलना केली, ते आम्हाला राजकारणातून संपवू शकत नाही. छातीवर दगड ठेवून निर्णय घेत आहे.
जनसंघापासून आम्ही भाजपचे काम करतो. गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांला राजकारणातून संपून टाकण्याची भाषा केली. खच्चीकरण केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शेळके यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही निवडणूक जिंकणारच आहोत. पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढे मोठे केले. तीनदा उमेदवारी दिली. आमदार, मंत्री केले. पण मावळमध्ये पक्ष कार्यकर्ता वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माफी मागून निर्णय घेत आहे, असे बाळा भेगडे म्हणाले.
बाळ माने ठाकरे गटात
भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने रत्नागिरीचे नाराज माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती मशाल घेतली. त्यामुळे रत्नागिरीमधील निष्ठावंत नाराज झाले आहेत. तसे असले तरी ठाकरे गटाने बाळ मानेंना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात बाळ माने लढत देणार आहेत.