करमाळा- वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे जेऊर, दहिगाव, आणि वांगी नंबर २ येथील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. काढणीला आलेल्या केळी बागांचे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली असून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
सोमवारी तालुक्यातील जेऊर, दहिगाव, वांगी नंबर दोन या पट्ट्यात वादळ वाऱ्याने थैमान घातले होते. यात मोठ्या प्रमाणात केळी पिकांचे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग मोठा असल्याने बहुतांश ठिकाणी केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. केळीचे नुकसान झाल्यामुळे केळीउत्पादक हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी केळी बागांचे नुकसान गेल्या आठवड्यातही झाले आहे.
माजी आमदार पाटील यांनी नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली आहे. त्यानंतर बोलताना नुकसानभरपाईची मागणी केली असून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात यावा. हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांच्या नजरेसमोर उद्ध्वस्त झाल्याने आता शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे उन्हाची प्रचंड तीव्रता आणि उजनीची पाणी पातळी वजामध्ये गेली असताना मोठी कसरत करुन शेतकऱ्यांनी पिकांची जोपासना केली होती. नैसर्गिक संकटाचा मोठा फटका शेतीस बसला आहे. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना किमान एकरी एक लाख रुपयांची भरपाई मिळावी, असे पाटील म्हणाले.