मुंबई : शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी खिचडी, घुग-या, दूध, अंडी असे पदार्थ दिले जातात. मात्र यावरून आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मध्यान भोजनात (मधल्या सुटीतील जेवणात) विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याच्या निर्णयाला भाजप जैन सेलने तीव्र विरोध केला आहे.
भाजप जैन सेलकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विरोध करत कडधान्याची पाकीटे पाठवण्यात आली आहेत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना ही कडधान्याची पाकीटे पाठवली गेली आहेत. मध्यान भोजनात (मधल्या सुटीत) विद्यार्थ्यांना अंडे वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशी मागणी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे.
निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकीटे पाठवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याला मंत्री दीपक केसरकर घाबरतात का? असा सवाल देखील आवेळी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी उपस्थित केला आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याबाबत पत्र लिहिले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विद्यार्थाच्या पोषण आहारात ‘अंडी’ चा समावेश केला आला आहे. मात्र या निर्णयाबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करत आहोत. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि विविध पंथ-संप्रदायांच्या प्रमुखांनी व घटकांनी देखील याबाबत आमच्याकडे कडाडून विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंडी व फळे विकत घ्यायची आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रुपये, याप्रमाणे अग्रिम दिला जाणार आहे.