नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपला ३०० जागा मिळाल्यावर अयोध्येत राम मंदिर बांधले आता यावेळी जर भाजप लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्यात यशस्वी ठरला तर मथुरेमध्ये कृष्णजन्मभूमीवर आणि वाराणसीमध्ये मंदिर बांधले जाईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त काश्मीर देखील परत घेतला जाईल, असा दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
सरमा पुढे म्हणाले की, जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की, एक काश्मीर भारतात आहे आणि दुसरे पाकिस्तानमध्ये आहे. पीओके खरोखर आमचा आहे यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. सध्या पीओकेमध्ये दररोज निदर्शने होत आहेत आणि पाकिस्तानमधील लोक भारताचा तिरंगा झेंडा घेऊन पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. जर मोदीजींना ४०० जागा मिळाल्या तर पीओके देखील भारताचा एक भाग होईल असे सरमा म्हणाले.
भाजप सरकार आरक्षण बळकट करण्याचे करत आहे काम
पंतप्रधान मोदी स्वत: मागासवर्गीय आहेत. गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता असून देशात आरक्षण बळकट करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले. काँग्रेसला देशातील एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे आणि त्यांनी याची सुरुवात कर्नाटकातून केली आहे, असेही ते म्हणाले.