31.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्र‘शिवभोजन’, ‘आनंदाचा शिधा’ला ब्रेक?

‘शिवभोजन’, ‘आनंदाचा शिधा’ला ब्रेक?

‘लाडकी बहीण’चा खर्च, तिजोरीत खडखडाट

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एक लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यासह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार वाढला आहे. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणा-या विविध विभागनिहाय बैठकांमध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार आहे.

शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना सुरू करण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दोन लाख कोटींहून अधिक तूट आहे. त्यामुळे एक लाख कोटींची तूट भरून काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो, असे अर्थमंत्र्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विभागवार बैठका झालेल्या आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधासह इतर योजना बंद होण्याची शक्यता आहे.

शिवभोजन थाळीचे दिवसाचे लाभार्थी १९०००० आहेत. या योजनेसाठी वार्षिक खर्च २६३ कोटी रुपये लागतात. त्यामुळे ही योजना बंद करावी का अशी चाचपणी सुरू आहे. आनंदाचा शिधा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती. दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. आनंदाचा शिधा म्हणून चार वस्तू १०० रुपयांत दिल्या जातात. बाजारात याची किंमत ५०० रुपये इतकी आहे. त्यामुळे उरलेली रक्कम राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरत होते.

दोन्ही योजना बंद करण्याची वेळ येते की काय अशी चर्चा आहे. अर्थमंत्र्यांनी काही आढावा बैठका घेतलेल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही योजना बंद करायच्या का अशी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यापूर्वी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करावी का अशा चर्चा झाल्या होत्या तेव्हा विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे या योजना बंद करायच्या का अशा चर्चा सुरू आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार वाढलेला आहे. कंत्राटदारांची ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजनेबाबत काय निर्णय होतो ते पाहावे लागेल.

‘शिवभोजन’साठी वार्षिक २६७ कोटी खर्च
शिवभोजन थाळी उपक्रमामुळे भुकेलेल्यांना वेळेवर दोन घास मिळतात ही समाधानाची बाब आहे. शिवभोजनच्या दररोज २ लाख थाळींसाठी वार्षिक २६७ कोटी खर्च येतो.

भुजबळांचे सरकारला पत्र
छगन भुजबळ यांनी ही शिवभोजन थाळी योजना बंद करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब गरजू दररोज दोन लाख थाळींचा आनंद घेतात. या थाळीसाठी वर्षाला २६७ कोटी खर्च येतो. शासनाच्या दृष्टीने भुकेल्यांच्या पोटासाठी २६७ कोटी हा खर्च नगण्य आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR