मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेचे पाच सदस्य विधानसभेवर निवडूण गेल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. रिक्त झालेल्या पाचही जागा सत्ताधारी महायुतीच्या आहेत. १० मार्चपासून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर २७ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी पक्षाने विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमदारांना विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. यामध्ये भाजपचे प्रवीण दटके (नागपूर मध्य), गोपीचंद पडळकर (जत) आणि रमेश कराड (लातूर ग्रामीण), शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी (अक्कलकुवा) आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (पाथरी) यांचा समावेश होता. हे पाचही आमदार विधानसभेवर निवडूण गेल्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्चाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पाचही जागा रिक्त झाल्या होत्या. केंद्रिय निवडणूक आयोगाने पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहिर करण्यात केली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १७ मार्च असेल. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० मार्च शेवटची तारीख आहे. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.