बुलडाणा : महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर ५० लाख पकडले तर ते ५० हजार दाखवतात, असे आक्षेपार्ह विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यानंतर संजय गायकवाड सर्व बाजूंनी अडचणीत आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आ. संजय गायकवाड गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
संजय गायकवाड म्हणाले, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिका-यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
एकनाथ शिंदे पण आमचेच आहे. तसेच देवेन्द्र आमचे नेते आहे. ते मला याबद्दल बोलले असते तरी काही अडचण नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी माझे शब्द मागे घेतो. या वक्तव्यावर आपण विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करत आहे असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी प्रतिमा : सामंत
शिवसेना नेते उदय सामंत यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गायकवाड यांच्या वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी प्रतिमा आहे. देशात महाराष्ट्र पोलिसांनी उत्कृष्ट काम करून दाखवले. संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पद्धतीचे वक्तव्य वारंवार चालणार नाही. मी शिंदे साहेबांकडे तक्रार केली. त्यांना कडक समज द्या, अशी मागणी केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.