लातूर : अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या सहकार्याने व टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कलापंढरी संस्थेमार्फत लातूर येथील बाल न्याय मंडळ आणि निरीक्षण गृहात शुक्रवार दि. ३० मे रोजी विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या मदत कक्षाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा बाल न्याय मंडळाच्या प्रमुख श्रीमती आरती शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, निरीक्षण गृहाचे अधीक्षक जोंधळे, बाल न्याय मंडळाच्या सदस्य श्रीमती छाया मलवाडे व श्रीमती छाया अकाते, बालकल्याण समितीच्या सदस्य श्रीमती स्वाती तोडकर, कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी. पी. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमती आरती शिंदे म्हणाल्या की मुलांनी चांगल्या मित्रांची संगत धरावी आणि शिक्षणाचे महत्त्व जाणावे. किरकोळ गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रक्रियेवर भर देणे आवश्यक आहे. अनेकदा मुले विनाकारण अशा प्रक्रियेत ओढली जातात, त्यांना बालस्रेही वातावरण देऊन मार्गदर्शन व सहकार्य करणे गरजेचे आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांची जबाबदारी केवळ पालक किंवा शासनाची नसून संपूर्ण समाजाची आहे. यासाठी समाजातील सुजाण व प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी गावपातळीवरील पोलिस स्टेशनमध्ये बालस्रेही कार्यकर्ता म्हणून काम पहावे असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी मदत कक्ष हा विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी बाल न्याय प्रणाली अधिक सुलभ व प्रभावी करण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ पाच जिल्ह्यांमध्ये लातूरची निवड होणे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे असे नमूद करत त्यांनी मदत कक्षाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवदर्शन सदाकाळे यांनी तर आभार बाल निरीक्षण गृहाचे अधीक्षक जोंधळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलापंढरी संस्थेचे समन्वयक शिवदर्शन सदाकाळे, धनराज पवार, बाळू जंगापल्ले, अॅड. सुनेना बायस, श्रीमती मंगल मगर, श्रीमती फराना शेख तसेच गावपातळीवरील सर्व समुदाय संघटकांनी परिश्रम घेतले.