बीजिंग : चीनने मागच्या काही वर्षात झपाट्याने विकास केला असून आर्थिक महासत्ता म्हणून एक दरारा निर्माण केला आहे. अमेरिका, रशियानंतर चीनने जगात आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. पण भारत आणि चीनचे संबंध काही चांगले नाहीत. अनेकदा सीमेवरून वाद झाला आहे. चर्चा होत असली तरी त्यात तसा काही ओलावा दिसत नाही. दुसरीकडे, भारताचा शत्रू तो आपला मित्र अशा रणनितीवर चिनी ड्रॅगन काम करत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात चीनने पाकिस्तानसोबत जवळीक साधली आहे.
पाकिस्तान हा देश भिकेला लागलेला असताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तसेच मोठमोठे प्रकल्प पाकिस्तानात चीनच्या कृपेने सुरु आहे. मात्र असे सर्व होत असताना चिनी ड्रॅगनला देखील पाकिस्तानातील दहशतवादाचा अडसर आहे. पाकिस्तानातील शहबाज सरकार चीनच्या नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात असमर्थ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एससीओ समिटमध्ये पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
जागतिक बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पांमध्ये पाकिस्तान हा एक केंद्रबिंदू आहे. पण या प्रकल्पांवर काम करणा-या चिनी नागरिकांसाठी सुरक्षा धोक्यात आहे. त्यामुळे दोन जवळच्या मित्र राष्ट्रांमधील तणावाचे कारण बनले आहे. चीनने हे प्रकरण उचलून धरले. एससीओ समिटमध्ये पाकिस्तानवर पुरेपूर दबाव टाकला. चिनी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार चीन दहशतवादाविरुद्धच्या पाकिस्तानच्या लढाईला पाठिंबा देतो आणि पाकिस्तानमधील चिनी कर्मचारी, प्रकल्प आणि संस्थांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तान प्रभावी उपाययोजना करेल अशी आशा करतो.
दुसरीकडे, पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शी यांच्यासोबतच्या भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे. पण सुरक्षेच्या मुद्द्याचा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक टाळला आहे. पाकिस्तान सरकार चिनी प्रकल्प आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी हजारो लष्करी तुकड्या, निमलष्करी दल आणि पोलिस तैनात केले आहेत. पण त्याचा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे वाढत्या हल्ल्यामुळे चीनला पाकिस्तानात आपले सुरक्षा दल तैनात करायचे आहे. चीन त्या दृष्टीने पाकिस्तानवर दबाव टाकत असल्याचे दिसत आहे. भविष्यात चिनी सैनिक पाकिस्तानात दिसले तर आश्चर्य वाटायला नको.