नवी दिल्ली : उत्तर, मध्य आणि ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुके कायम आहेत, १५ जानेवारीपर्यंत कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. तर दाट धुक्क्यांचा परिणाम रेल्वे आणि विमान उड्डाणांवर झाल्याचे दिसून येत आहे.
११ ते १५ जानेवारी या कालावधीत पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये सकाळी काही तास दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज (गुरुवारी) पहाटे ५:३० वाजता पंजाबमधील भटिंडा आणि आग्रा येथे दृश््यमानता ० मीटर, त्रिपुराच्या आगरतळा येथे २५ मीटर तर जम्मू, उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्य प्रदेशातील सतना, बिहारमधील पूर्णिया, आसाममधील तेजपूर आणि हरियानामध्ये ५० मीटरपर्यंत खाली आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसात तामिळनाडू, केरळ, किनारपट्टी कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यानंतर कोरडे हवामान राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.