परभणी : मागील दोन महिन्यापासून नवीन गाड्यांचे लॉलीपॉप मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना दमरेने दाखवले आहे. उन्हाळा मध्यावर आला तरीही दक्षिण-मध्य रेल्वेने मराठवाडयातील प्रवांशाठी अद्याप उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची सोय दिली नाही असा संताप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दमरेच्या व्यवस्थापक नीती सरकार यांची भेट घेऊन व्यक्त केला आहे. तसेच पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर गोवा इत्यादी शहरांना जोडणा-या गाड्या तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी केली आहे.
या वेळी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वेच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. मराठवाड्यातील केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री यांचा आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या जालना-छप्रा आणि जालना-तिरूपती या दोन्ही रेल्वे गाड्यांना बंद करून आपला मनमानी कारभार दमरेने दाखवून दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात नूद करण्यात आले आहे की, आठ दिवसा पूर्वी उन्हाळी सुट्टीत नियोजन असलेली नांदेड-पनवेल रेल्वे ४० फे-या ऐवजी २ फेरी नंतर प्रवासी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
पहिल्याच फेरीत सदर रेल्वेला नांदेड येथून रात्री ११ ऐवजी सकाळी ६ ला म्हणजे तब्बल ७ तास उशीराने सोडल्यावर कोण प्रवासी सदर रेल्वेत प्रवास करणार? हम करे सो कायदा प्रमाणे दमरे विभागातील अधिकाारी एसी कार्यालयात बसून त्यांना हवा असलेल्या गाड्यांना बळजबरीने थोपटून त्याच वेळेस प्रवाशांना उपयोग नसलेल्या गाड्यांना मात्र बळजबरीने चालवण्यात येतात असा आरोप निवेदनात केला आहे. सर्व जलद गाड्यांचे २५ किमी प्रमाणे प्रवास करून प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून तोडण्यात येत आहे. मराठवाडयात नवीन गाड्यांची सोय न मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मराठवाडा विरोधी अधिका-यांची एक लॉबी कार्यरत आहेत. खासगी टॅव्हल्स चालकांकडून मिळणा-या आर्थिक मलिद्यापोटी हे सर्व सुरू असून गलथान कारभार करणारे अधिका-यांची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिका-यांना निलंबित करण्यात यावे. मराठवाडयातील प्रवाशांच्या हक्काच्या गाड्यांना तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दमरे व्यवस्थापक निती सरकार यांना निवेदन देताना मराठवाडा प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, शंतनू डोईफोडे, हर्षद शहा, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, खदीर लाला हाश्मी, अमित कासलीवाल, नारायणराव अकमर, रुस्तुम कदम उपस्थित होते.