धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव, लातूर आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी तब्बल ७१९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना केवळ १२५ मते मिळाली, तर बसवराज पाटील यांनी तब्बल ८४४ मते घेत दणकेबाज विजय नोंदवला. विशेष म्हणजे, बसवराज पाटील यांनी राज्यात सर्वाधिक मते मिळवून विजयी होण्याचा मान पटकावला आहे.
मतांचे गणित आणि बंडखोरी
या निवडणुकीसाठी एकूण ९८८ मतदार होते, त्यापैकी ९८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल १२५ मते फुटून ती महायुतीच्या पारड्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र नसल्याचेच या निकालातून समोर आले असून, हा आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) जाणार या चर्चेमुळे त्यांच्या समर्थक मतदारांनी महायुतीला साथ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी बसवराज पाटील यांना भक्कम साथ दिल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
बसवराज पाटील यांच्या या विक्रमी विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी धाराशिवसह विविध ठिकाणी जोरदार आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. बसवराज पाटील यांच्या विजयामुळे उमरगा तालुक्याला आता दोन आमदारांचे बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे
















