21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयथेट आर्थिक लाभ ही मोदी गॅरंटी

थेट आर्थिक लाभ ही मोदी गॅरंटी

शेतकरी, युवा, महिला गरीब सशक्त व्हायला हवेत : मोदी

यवतमाळ : प्रतिनिधी
एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला. यूपीए सरकारच्या काळातील स्थिती आठवून पाहा. तेव्हाचे कृषिमंत्री महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीतून विदर्भाच्या शेतक-यांच्या नावाने पॅकेज घोषित केले जायचे. परंतु ते पॅकेज मध्येच लुटले जात होते. गावागावांमध्ये गरीब शेतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हते. परंतु आज मी एक बटण दाबले आणि पीएम किसान सन्मान निधीचे २१,००० कोटी रुपये कोट्यवधी शेतक-यांच्या खात्यावर जमा झाले. हीच मोदींची गॅरंटी आहे. गरीब , युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तरच देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे, असे मोदी म्हणाले.

यवतमाळनजीकच्या भारी शिवारात बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी २ हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुस-या आणि तिस-या हफ्त्यापोटी ४ हजार, असे एकूण प्रतिशेतकरी सहा हजार रुपये आज शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली. काँग्रेसचे सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि तो रुपया लोकांकडे पोहोचेपर्यंत त्यातले केवळ १५ पैसे उरायचे. आज काँग्रेसचे सरकार असते तर जे २१ हजार कोटी रुपये आज शेतक-यांना मिळाले, त्यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटले गेले असते आणि केवळ तीन हजार कोटी लोकांना मिळाले असते. परंतु आता भाजपा सरकारच्या काळात गरिबांचे सर्व पैसे त्यांना मिळत आहेत. हीच मोदींची गॅरंटी आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळेल. पै-पै त्याच्या खात्यात पोहोचतील, असे पंतप्रधान म्हणाले.

प्रत्येक कोप-याचा
विकास करणार
आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोप-याला विकसित बनवण्याचे माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे, असे मोदी म्हणाले.

राज्य शासनाचे
३८०० कोटी मंजूर
आता महाराष्ट्रातील शेतक-यांंना ३,८०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे दर वर्षी १२ हजार रुपये मिळत आहेत. किसान सन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे छोट्या शेतक-यांच्या कामी येत आहेत.

सन्मान निधीचा हप्ता
शेतक-यांच्या खात्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी शेतक-यांसाठी दिल्या जाणा-या पीएम सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वाटप केले. यावेळी त्यानी २१ हजार कोटी रुपयांची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा केली. ९ कोटींवर शेतक-यांना याचा लाभ मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR