सोलापूर : येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आणि ल.गो. काकडे एज्युकेशनल ट्रस्टतर्फे सभासद ज्ञाती बांधवांच्या पहिली ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि गरजू पाल्यांना सुमारे दीड लाख रुपयाचे अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दहावी आणि बारावी मध्ये उत्तम यश मिळविलेल्या गुणवंत आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांचाही सत्कार करून त्यांनाही अर्थसहाय्य आणि शालेय साहित्य देण्यात आले.
हा कार्यक्रम देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या रामदास संकुल येथील समर्थ सभागृहात सोलापूरच्या सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. माधुरी वाळवेकर आणि निवृत्त प्राध्यापिका आणि इतिहासाच्या अभ्यासिका डॉ. लता अकलूजकर यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर, संस्थेच्या सहकार्यवाह आणि काकडे ट्रस्टच्या प्रमुख डॉ. नभा काकडे, संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता आराध्ये, विजय कुलकर्णी, कार्यवाह श्याम जोशी, युवक शाखा अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतीश पाटील, कार्यकारिणी सदस्य रवींद्र तुळजापूरकर, प्रा. किरण कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वाळवेकर म्हणाल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून आपले भवितव्य उत्तम घडवावे. प्रत्येक गोष्टीत सातत्य राखावे त्यामुळे यश मिळत जाते. तर डॉक्टर अकलूजकर म्हणाल्या सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी अखंड ३५-४० वर्ष कार्य करून हिंदवी साम्राज्याची स्थापना केली होती आणि आपले ध्येय साध्य केले होते. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील काही वर्षे जिद्दीने अभ्यास करून आपले उद्दिष्ट, ध्येय साध्य करावे. डॉक्टर येळेगावकर यांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांनी आपल्या पाल्यांवर आपल्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा लादून त्यांच्याकडून पूर्ण करण्याची अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना शिक्षण द्यावे आणि त्यातच त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणजे त्यांची चांगली प्रगती होईल असे सांगितले .