25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्र‘श्रीगुरुजी पुरस्कारा’चे ३ मार्च रोजी वितरण

‘श्रीगुरुजी पुरस्कारा’चे ३ मार्च रोजी वितरण

पुणे, प्रतिनिधी
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भारती दक्षिण तामिळनाडू’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम, केरळ’ या दोन संस्थांची यंदाच्या ‘श्रीगुरुजी पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. येत्या दि. ३ मार्च रोजी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा २९ वे वर्ष आहे. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. संस्थेचे कार्यवाह राजन गोरे, संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सेवाकार्य प्रमुख शैलेंद्र बोरकर आणि ‘सेवा भारती’ पश्चिम महाराष्ट्र या संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस यावेळी उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे.

माजी लोकसभाध्यक्ष सुमित्राताई महाजन पुरस्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया प्रमुख वक्ते आहेत. ‘सेवा भारती’ ही संस्था दक्षिण तामिळनाडूतील ३१ जिल्ह्यांमध्ये सेवेच्या क्षेत्रात काम करत आहे. गेल्या चौतीस वर्षांपासून हे काम सुरू असून संस्थेतर्फे ३१ जिल्ह्यांमध्ये ५४१ ठिकाणी ८ हजारांहून अधिक सेवाकार्ये चालवली जात आहेत.

केरळमधील तिरुवअनंतपूरम येथे १९८२ साली स्थापन झालेल्या ‘भारतीय विचार केंद्रम’ या संस्थेतर्फे प्रामुख्याने प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा जतनाचे तसेच भारतीय जीवनमूल्ये आणि जीवनदर्शनाचा प्रचार-प्रसार हे कार्य चालते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR