तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मंदीर जीर्णोद्धाराचे काम पुढील किमान ५०० वर्षे अबाधित राहील अशा प्रकारचे गुणवत्ता पूर्ण काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्या नंतर मंदिरातील सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करून श्रीक्षेत्र तुळजापूर मंदीर व परिसर विकास आराखड्याची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी लक्ष देऊन अतिशय उत्कृष्ट आराखडा बनविला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सदरील बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव यांच्यासह वास्तु विशारद व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा, यासाठी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले. आगामी दोन वर्षात मंदीर जीर्णोध्दाराचे काम पूर्ण करण्यासह किमान पुढील ५०० वर्ष हे काम अबाधित राहील अशा प्रकारचे दर्जेदार काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
मंदिर पुर्नबांधणीच्या कामात भवानी शंकर मंडपासमोरील काही स्तंभ बदलावे लागणार असून, या ऐतिहासिक स्तंभाच्या कलाकृतीचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जे स्तंभ बदलावे लागणार आहेत, त्यावरील कोरीव काम ८ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानंतर प्रत्यक्षात हे स्तंभ जागेवर आणून मंदिराचे काम सुरू करून सहा महिन्यात ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रुपये १८६६ कोटीच्या श्री तुळजाभवानी मंदीर व परिसर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळालेली आहे.
यामध्ये दर्शन मंडप, भव्य प्रवेशद्वार, आकर्षक कमानी, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी माता तलवार देतानाचे शिल्प, लेझर शो, बाग-बगीचा या प्रमुख बाबींचा समावेश आहे.