नवी दिल्ली : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर केले असून यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली असल्याने त्यांना पुरस्कार जाहीर झाले. हा पुरस्कार ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षा आणि साक्षरता विभागाने देशभरातील २७ राज्ये, ७ केंद्रशासित प्रदेश आणि ६ संस्थांमधून ४५ शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ साठी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर येथील डॉ. शेख मोहम्मद वकइओद्दीन शेख हमीदोद्दीन आणि लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्समधील डॉ. संदिपान गुरुनाथ जगदाळे यांचा समावेश आहे.
या दोन्ही शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या समर्पित कार्यामुळे हा पुरस्कार मिळवला आहे. निवड प्रक्रिया पारदर्शी आणि कठोर स्वरूपाची असून ती जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर २३ जून ते २० जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पार पडली. एकूण ४५ पुरस्कार विजेत्यांपैकी २४ पुरुष आणि २१ महिला शिक्षकांचा समावेश आहे.
उच्च शिक्षणात दोघांचा समावेश
उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ साठी देशभरातील २१ शिक्षकांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईतील शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नीलाक्षी जैन आणि बारामती येथील एस. व्ही.पी.एम. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्रा. पुरुषोत्तम पवार यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, उच्च शिक्षणातील प्रेरक आणि सक्षम प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२३ मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. निवड प्रक्रियेत अध्यापन परिणामकारकता, समाजाभिमुख उपक्रम, संशोधन, नवोन्मेष आणि प्रायोजित संशोधन यासारख्या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. डॉ. जैन आणि प्रा. पवार यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन आणि सामाजिक योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त केला आहे.