मुंबई : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. पण सासरा आणि दीर फरार होते. दरम्यान, फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी पहाटे अटक केली. या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीएम फडणवीस यांनी दिली. सीएम फडणवीस म्हणाले, आज सकाळीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कारवाई केली आहे. पुढे हे प्रकरण तडीस घेऊन जाण्यापर्यंत जे काही करता येईल त्या गोष्टी पोलिस करतील असेही फडणवीस म्हणाले.
अशा प्रकारे आत्महत्येला प्रवृत्ती करणे अशा गोष्टी सहन करणार नाही. कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल. मकोका लावण्याकरता त्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोका लागू शकेल. पण, नियमात बसेल की नाही हे आज सांगू शकत नाही, असंही सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याप्रकरणी अजित पवार गंभीर आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २१ व्या शतकातही मुली आणि सुनांमध्ये फरक करणे फार चुकीचे आहे. – त्यांना अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे. याप्रकरणी अजित पवार गंभीर नाहीत असे नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की, कोणी जर बोलवले तर आपण जातो, पण पुढे काय घडणार याची कल्पना नसते एवढा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.