बाडमेर : भाजप तिस-यांदा देशात सत्तेत आल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ते बदलून टाकतील असा दावा काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात आहे. भाजपच्या खासदाराचे विधानच त्यासाठी पुरावा म्हणून दिले जात आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. आम्ही संविधान बदलणार नसल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजस्थानच्या बाडमेर येथील रॅलीतून यावर भाष्य केले आहे. स्वत: बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान बदलले जाणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले आहे. मोदींनी थेट काँग्रेसला उत्तर देत संविधान बदलण्याच्या चर्चांनाच पूर्णविराम दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच बाबासाहेबांनी बनवलेले संविधान हे नुसते संविधान नाही तर आपल्यासाठी संविधान म्हणजे कुरान, बायबल आणि गीता आहे असे मोदी म्हणाले. संविधानावर वारंवार चर्चा होते. मोदींचे शब्द लिहून ठेवा, बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधाना बदलले जाणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपले संविधान सरकारसाठी गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, कुरान आहे, बायबल आहे. हे सर्व काही आमच्यासाठी आपले संविधान आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
थापेबाजीपासून सावध राहा
एससी, एसटी, ओबीसी बंधू भगिनीशी अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस सध्या जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा संविधानाच्या नावाने इंडिया अलायन्सवाले खोटे बोलत असतात. ही त्यांची फॅशन झाली. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केले, ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही, ज्यांनी देशात आणिबाणी लागू करून संविधान संपवण्याचे काम केले, आज ते मोदींना शिव्याशाप देण्यासाठी संविधानाच्या नावाने खोटे बोलत आहेत. मीच देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने तर संविधान दिनालाही विरोध केला होता. हा बाबासाहेब आणि त्यांच्या संविधानाचा अपमान नव्हता काय? आम्ही बाबासाहेबांशी संबंधित पाच तिर्थस्थळांचा विकास केला. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या थापेबाजीपासून सावध राहा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.