मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा पूर्णपणे राजकीय होती. सभेचा खर्च पक्षाच्या वतीने केला जाणे अपेक्षित होते, मात्र हा खर्च शासकीय तिजोरीतून करण्यात आला. तसेच सभेतील मांडवासाठी बारा कोटी, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी खर्च केला जातोय. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मराठवाडा, विदर्भ भागात मोठ्या प्रमाणात लोकांना सभेसाठी गोळा करायचा प्रयत्न केला गेला. त्यातल्या त्यात महिलांना भाजपाने गोळा केले. यावेळी महिलांना गोळा करतानाचा एक व्हीडीओ नाना पाटोले यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. लोकप्रियता वाढवण्यासाठी अशा प्रकारची गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मोर्चे काढणा-या आंदोलक जरांगे यांच्याविरोधात एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे किती गाड्यात किती लोकांना बसवले पाहिजे यासाठीदेखील कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी माणसे जमवण्याचे काम भाजपाने केले आहे. त्यामुळे भाजप सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत जनतेलाच त्रास देत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल
नांदेड जिल्ह्यातील तीनही आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेससोबतच आहेत. काही जण भीतीपोटी काँग्रेस पक्ष सोडून गेले. मात्र, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच आहेत. काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचे काम अधिक जोमाने सुरू असल्याचे ते म्हणाले. नांदेडमधील तीनही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर काँग्रेससोबतच आहेत. तसेच नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.