नवी दिल्ली : कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली नसून येत्या ३१ मार्चपर्यंत ही बंदी कायम राहणार असल्याचे ग्राहक घडामोडीविषयक खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांनी मंगळवारी सांगितले. सरकारच्या या खुलाशामुळे शेतक-यांच्या पदरी निराशा पडली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३१ मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील, असे सांगून सिंह म्हणाले की किमती वाढू नयेत यासह देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर- २०२३ मध्ये सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यात बंदी मागे घेण्यात आल्याचे वृत्त मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले होते. यानंतर लासलगाव घाऊक बाजारात कांद्याचे दर कडाडले होते. प्रतिक्विंटलचे भाव १२८० रुपयांवरून १८०० रुपयांवर गेले होते. मात्र ३१ मार्चपर्यंत निर्यात बंदी उठणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याने कांद्याच्या दर वाढीवर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.