मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढलेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान ऑडी कारला झालेल्या अपघातावरून राऊतांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला असून, महाराष्ट्राचे गृहखाते हाताळण्याची त्यांची क्षमता नाही, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. तसेच अपघाताचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला असून, फडणवीस जोपर्यंत गृहमंत्रिपदी राहतील तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
मात्र, या संपूर्ण प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असे म्हटले आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला की त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा दारूच्या नशेत होता आणि त्याने नागपुरात दोन जणांना मारहाण करून गंभीर जखमी केले. एफआयआरमध्ये नाव नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि गाडीची नंबर प्लेटही काढली.
फडणवीस गृहमंत्रिपदावर राहण्यास पात्र नाहीत
दरम्यान, गृहखात्याचे नेतृत्व प्रभावीपणे करण्यात देवेंद्र फडणवीस अयशस्वी झाले आहेत. यामुळे ते या पदावर राहण्यास पात्र नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. कारची नोंदणी फक्त बावनकुळे यांच्या नावावर आहे. जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.