नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तिस-यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे या असामान्य कामगिरीबद्दल कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी खास ट्विट करत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त केल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झाला. न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने ४९ षटकातच ते गाठत विजयाला गवसणी घातली. कर्णधार रोहित शर्माच्या खेळीने भारताच्या विजयाचा पाया रोवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, एक असामान्य कामगिरी आणि त्याचा असामान्य निकाल! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल क्रिकेट संघांचा अभिमान वाटतोय. त्यांनी पूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. शानदार खेळ केल्याबद्दल आपल्या संघाचे खूप खूप अभिनंदन अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.
इतिहास घडविला : अमित शहा
एक असा विजय ज्याने इतिहास घडविला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जोरदार विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. मैदानावरील तुमची प्रेरणादायी ऊर्जा आणि विजयी रथाने देशाचा गौरव वाढवला आहे. उत्कृष्ट क्रिकेटसाठी आणखी एक उंची तुम्ही स्थापित केली. पुढील स्पर्धांमध्ये अशीच कामगिरी करत रहा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.