वर्धा : जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील भिडी येथील एका दुचाकी चालकाचा पतंगीच्या नायलॉन मांजामुळे गळ्याला फास लागून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भिडी येथील रस्त्यावर घडलेल्या या दुर्घटनेत एका निष्पाप शेतक-याला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुसरीकडे सोलापूर विमानतळ परिसरातही नॉयलॉन मांजामुळे विमान वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी कारवाई करत विक्रेता आणि पतंग उडवणा-या मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला आहे. भिडी येथील सुभाष शेलोटे हे पन्नास वर्षीय शेतकरी आपल्या शेतातील फवारणीचे आपले काम आटोपून दुचाकीने घराकडे जात असताना अचानक रस्त्यावर गळ्याला पतंगीचा मांजा आवळला गेला.
पतंगीचा हा मांजा अतिशय घातक आणि धारदार असल्याने त्यांचा गळा चिरला व गळ्याला घट्ट फासही बसला गेला. त्यामुळे, या दुर्दैवी अपघातात सुभाष शेलोटे यांचा मृत्यू झाला. नायलॉन मांजाच्या धाग्याने बळी घेतला असून सुभाष हे दुचाकीवरूनच गाडीवर पडले, त्यानंतरच जागेवरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भिडीतील या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा प्रकोप समोर आला असून मांजाला बंदी असताना हा नॉयलॉन मांजा येतो कुठून? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

