नागपूर : प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात काल सकाळी नेऊरवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतक-याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतक-याचे नाव रवी कवडू कालसर्पे (३८) असून तो सकाळी शेतात काम करत असताना वाघाने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांनी पोलिस आणि वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रवी कालसर्पे आणि त्याची पत्नी सकाळी ११ वाजता शेतात कामासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने रवीवर अचानक पाठीमागून हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला.