पूर्णा : तालुक्यातील गोविंदपूर येथील एका शेतक-याच्या मुलाने वडीलांनी बँकेचे घेतलेले कर्ज फेडणे होत नसल्याने वैफल्यग्रस्त होवून रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना ७ मे रोजी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर, जमादार गजानन गवळी, शिपाई विलास मिटके यांनी धाव घेत पंचनामा केला.
पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील राजू शिवाजीराव चौधरी (वय ३७) या युवकाने ६ मे रोजी रात्री १० वाजता ते ७ मे रोजीच्या ५ वाजेदरम्यान गावाजवळून गेलेल्या पूर्णा नांदेड लोहमार्ग रेल्वे पटरीवरील रेल्वे गाडीखाली उडीघेवून आत्महत्या केली आहे. मयत राजू चौधरी यांचे वडील शिवाजीराव चौधरी यांनी काही वर्षाखाली एका राष्ट्रियकृत बैंकेचे कर्ज घेतले होते. वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता येत नव्हते म्हणून ताणावात येवून रेल्वे खाली उडी मारुन जिवनयात्रा संपवली. या घटनेमुळे गोविंदपूर गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास जमादार गजानन गवळी करीत आहेत.