नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमधील हजारो शेतकरी शंभू सीमेवर जमू लागले असून शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा उद्या १०० वा दिवस आहे. हे पाहता हजारो शेतकरी मोर्चा काढत आहेत. बुधवारी सकाळपासूनच शेतकरी आंदोलनस्थळी येऊ लागले आहेत. ग्राऊंड झिरोवर शेतक-यांनी मोठा मंडप उभारला असला तरी जागेजवळ अनेक छोटे तंबूही उभारण्यात आले आहेत.
आंदोलनस्थळी उभारलेल्या मंडपांमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने बसले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी दिल्लीकडे निघालेला त्यांचा मोर्चा रोखल्यानंतरही आंदोलक शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर आहेत. ताडपत्री, पंखे आणि रेफ्रिजरेटर असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे घरामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास असून हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सुमारे ४०,००० शेतकरी या ठिकाणी जमतील अशी शक्यता शेतकरी नेत्यांची आहे. पंजाब पोलिसांनीही वाहतूक सुरळीत चालण्यासाठी जागोजागी चौक्या उभारल्या आहेत.
काय आहेत मागण्या?
आज रणनीतीवर चर्चा करताना, हरियाणाचे अध्यक्ष अमरजीत सिंह मोहरी आणि जाट नेते अशोक बुलारा म्हणाले की आम्हाला एमएसपीची कायदेशीर हमी हवी आहे आणि डॉ स्वामीनाथन यांच्या सी२ प्लस ५० टक्के सूत्रानुसार त्याचा निर्धार हवा आहे. याशिवाय शेतकरी आणि शेतमजुरांची सरसकट कर्जमाफी, १० हजार रुपये प्रति महिना सामाजिक सुरक्षा, लखीमपूर खेरीतील शेतक-यांना न्याय आणि सरकारी खर्चाने पीक विमा योजना हवी आहे.