अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधा-यात केवळ ४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. ऐन उन्हाळ्यात हिळ्ळी बंधारा पुन्हा एकदा कोरडा पडल्याने ग्रामस्थ व भीमा नदी काठावरील सीमावर्ती भागातील शेतकरी हवालदील झाला आहे.
यावर्षी उजनी धरण ११० टके भरल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. या भागातील शेतक-यांनी कर्ज काढून व उसनवारी करून महागडे ऊस बियाणे विकत घेऊन ऊस पिकांची लागवड केली होती. सध्या पाण्याअभावी पिके जळून जात असल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. या भागातील शेतक-यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न आता सध्या धुळीस मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. उजनी धरणातून भीमा नदीत १० मार्चला पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र कालव्यातून सिंचनासाठी भरमसाठ पाणी सोडून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील गावे वंचित ठेवून आता उजनी धरणाची पातळी ३० टक्केपर्यंत आणून ठेवली आहे. अद्यापही सिंचनासाठी ४ हजार क्युसेकचा विसर्ग सुरुच आहे.
उजनी धरणातील पाणी केवळ शहरी भागांसाठीच आहे की काय? असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. आता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून तत्काळ उजनी धरणातून पाणी हिळ्ळी बंधा-यापर्यंत सोडून या भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी हिळ्ळी गावचे सरपंच आप्पासाहेब शटगार व परिसरातील शेतकरी बांधवांतून जोर धरत आहे.
हिळ्ळी बंधा-याच्या जोरावरच या भागातील शेतक-यांची शेती अवलंबून आहे. या बंधा-याच्या भरवशावरच या भागातील बहुसंख्य शेतकरी बागायत शेती पिकाचे नियोजन करतात. यंदा मात्र या भागातील शेतक-यांचे नियोजन फसल्याचे बोलले जात आहे. बंधा-याने अचानक तळ गाठल्याने पुढचे दोन महिने काढायचे ही शेतक-यांना चिंता आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासणार आहे. त्यामुळे हिळ्ळीकरांना पाणी बचतीचे नियोजन करावे लागणार आहे.