बीड : राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करत आहे, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचे नाही तर जिंकायचे सुद्धा आहे असे मनोज जरांगे म्हणाले. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचे आहे असे म्हणत २० जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणालाठी लढणा-या आंदोलकांना पोलिसांनी १८ जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झाले. आता मुंबईत २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचे.
जाळपोळ करू नका
मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असे मनोज जरांगे म्हणाले. त्या आमदारांना दारातसुद्धा उभा करू नका जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. मनोज जरांगे म्हणाले की, आतापर्यंत मराठ्यांच्या जीवावर हे आमदार, खासदार झाले, पण मराठा आरक्षणाच्या विषयावर कितीजण पुढे आले. आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जे साथ देणार नाहीत त्या आमदारांना दारातही उभा करू नका. जो मराठा आरक्षणासाठी लढेल तो आपला.